संत नामदेवांचे चरित्र



संत नामदेव(sant namdev maharaj) (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.

नामदेव हे ‘मराठीतील’पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवया जन्म स्थानी नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.

भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.

दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता.म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपूरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.

संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.

पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.

संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.

पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते

भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो.सत नामदेव यांनी आपल्या कीर्तनाच्या मध्य मातून त्यांनी भारतभर फिरले

संत नामदेवांसंबंधी आख्यायिका (sant namdev in marathi)
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.

गृहजीवन (sant namdev ji)
नामदेवांच्या घराण्यात विठ्ठलभक्त्ती पूर्वापार चालत आली असल्यामुळे अगदी बालपणापासून त्यांना विठ्ठलभक्त्तीचा छंद जदला होता. अर्भकावस्थेतच बोलण्याचा प्रारंभ `विठ्ठल विठ्ठल’ अशा नाममंत्राने झाला. संत

एकनाथ म्हणतात–
पंचवरुषी नामा जाहला / छंदु विठूचा लागला / 
एकाजनार्दनी सार / मंत्र जपे त्रिअक्षर //

अशा तऱ्हेने नामदेवांचे विठ्ठलप्रेम लहानपणापासून दुथडी ओसंडून बाहात होते. पांडुरंग मूर्तीला ते पाषाणमूर्ती न समजता साक्षात आनंदघन मानीत. या बालभक्त्ताच्या प्रेमपाशात तो आनंदघन पूर्णपणे गोवला गेला होता. या संदर्भात नामदेवांच्या बालपणीची एक आख्यायिका संगतात ती अशी-

नामदेवांच्या वडिलांचा असा एक नेम होता की, दररोज पूजा करून पांडुरंगाला ते नैवेद्य दाखवीत असत. एक दिवस दामाशेटीला कामाकरिता बाहेरगावी जावयाचे होते. म्हणून त्यांनी नामदेवाला देवळात जाऊन पूजा करावयास व नैवेद्य न्यावयास सांगितले. दुसऱ्या दिवशी नामदेव नैवेद्य घेऊन देवळात गेले व नैवेद्य खाण्याविषयी त्यांनी देवाची हात जोडून प्रार्थना केली. पण देव नैवेद्य खाईना. नामदेवांनी पुन्हा देवाला प्रार्थना केली,

“देवा, तूं जर आज नैवेद्य खाणार नाहीस, तर मी येथुन हालणार नाही.”

 असे बोलून ते तेथेच बराच वेळ बसले. भगवंतांनी नामदेवांची परीक्षा पाहाण्याचे ठरविले. बराच वेळ झाल्यावर नामदेव देवाला म्हणाले, 

“विठोबा, तू जर नैवेद्य खाणार नाहीस तर मी तुझ्या पायावर डोके आपटून प्राण देईन.”

जरा वाट पाहून देव नैवेद्य खात नाही असे पाहाताच नामदेव डोके आपटणार तोच भक्त्तवत्सल भगवंताने त्याला धरले व नैवेद्य आनंदाने खाल्ला. 

नामदेवांचे जुने-नवे चरित्रकार वरिल अलौकिक घटनेचा निर्देश करीत आले आहेत. ही घटना जरी चमत्कारपूर्ण मानली गेली असली, तरीसुद्धा या प्रकरणावरून बालनामदेवांच्या भोळ्या, श्रद्धाळू मनाचे दर्शन होते आणि या घटनेच्या प्रकाशात त्यांच्या भावी जीवनात क्रमशः घेडलेल्या इतर घटनांचा अर्थ समजून घेण्यास मनाची तयारी होते. 

हा बालभक्त्त सर्वकाल पांडुरंगाच्या भक्त्तीत दंग असे. हे पाहून दामाशेटी व गोणाई चिंतातुर झाली. नामदेवाने संसाराकडे लक्ष द्यावे व उद्योगधंदा करावा ही त्यांची इच्छा. म्हणून त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी गोविंदशेट यांची मुलगी राजाई हिच्याशी त्यांचे लग्न लावून दिले. तिच्यापासून नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल हे चार मुलगे व लिंबाई नावाची एक मुलगी अशी पाच अपत्ये त्यांना झाली. अशा प्रकारे नामदेवांचा संसार, कुटुंबाच्या गरजा, त्यांचा आईच्या आशाआकांक्षा वाढत चालल्या. याउलट, नामदेव संसाराविषयी 

भगवद्‍भजनी आसक्त्त होत चालले. नामदेवांच्या घरातील परिवारात-

गोणाई राजाई दोघी सासू सुना / दामा नामा जाणा बाप लेक //
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र / जन्मले पवित्र त्याचे वंशीं //
लाडाई गोडाई येसाई साखराई / चवघी सुना पाही नामयाच्या // 
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी / वेडीपिशी दासी त्याची जनी //

एवढ्या मोठ्या संसाराची जबाबदारी नामदेवांनी घ्यावी असे कुटूंबातील मंडळींना वाटे. पंरतु त्यांना विठ्ठलाचाच एकमेव ध्यास होता. त्यामुळे घरच्या मंडळींना प्रपंच आवरणे कठीण झाले. 

नामदेव विठ्ठलमंदिरात जात. तेथेच नामस्मरण करीत. विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आपले हितगुज सांगत. आपणच देव आणि आपणच नामदेव अशा प्रकारे संभाषण करीत. एकदा गोणाई स्वयंपाक करून नामदेवांची वाट पहात बसली, पण नामदेवांचा काही पत्ता नाही. तेव्हा संतापाने अगदी लाल होऊन त्यांना पाहण्याकरिता ती देवळाकडे गेली. तेथे पाहते तो नामदेव जणू काय चित्रातील पुतळ्यासारखे देवापुढे उभे. रागाच्या भरात तिने त्यांना हाताने ओढले मात्र,

तोच ते प्रेतासारखे जमिनीवर धाडकन्‌ पडले. त्याची ही अवस्था पाहून त्या प्रेमळ माउलीचा राग जागच्याजागी जिरला. अंतःकरण गहिवरून आले. त्यांना पोटाशी धरून ती रडू लागली. नामदेवांनी सावध होताच तिला प्रेमलिंगन दिले, पण लागलेच ते तिला म्हणाले, “आई, मी विठ्ठलाच्या ध्यानात मग्न असता, तू त्याची आणि माझी अशी ताटातूट केलीस म्हणून तू माझी आई नव्हेस.” गोणाई म्हणाली, “नामदेवा, अरे काय म्हणतोस हे? 

नऊ महिनेपर्यत पोटात वागवून तुला लहानाचा मोठा केला, तो एवढ्याकरिताच काय ? अरे बाबा, या विठोबाचा नाद सोड. याने कधी कोणाचे बरे केले नाही. आपला संसार बुडवू नकोस. काही परक्रम करून जन्माचे सार्थक कर. लौकिकाची काही चाड धर शिवण्याटिपण्यावर तू पाणी सोडलेस. घराकडे ढुंकून पाहात नाहीस. ही तुझ्या भक्त्तीची तऱ्हा तरी कोण बाबा?” 

अन्नेसी उपवासी बैसलासी येथें / काय देईल तूंते विठ्ठल हा //
जनिताअ जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळीता / आदणी सांभाळितो चराचरीं //
एक पांड्रंग दुजा नाहीं चांग / म्हणुनि याचा संग धरिला माते //

तेव्हा तू माझी काळजी करू नकोस.”

नामदेव ऐकत नाही, असे पाहून गोणाईने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळविला. ती म्हणाली, “विठ्ठला, आम्ही तुझी काडीचीही ओशाळी नसता, तू माझ्या मुलाला असा अगदी वेडापिसा करून का सोडलास? बऱ्या बोलाने माझे पोर माझ्या स्वाधीन कर, याच्या हातात भोपळा देऊन तू आम्हांला मात्र भिकेची पाळी आणलीस? कसली रे मेल्या तुझी दया? हे पाहा, `जीव मी देईन,की नामा नेईन’ हाच माझा निश्चय. अहो राही रखमाई, तुम्हाला साक्ष ठेवून मी सांगते की, मी नामा नेईन.”

आईचे हे बोलणे ऐकून नामदेव म्हणाले, “आई, पुढे काही लाभ होईल या आशेने तुम्ही मला पांडुरंगाच्या चरणापासून दूर ओढता, पण जन्ममरणाच्या दुःखाने होरपळून गेलेल्या माझ्या मनाचा नुसता विचारही तुमच्या मनात येत नाही, याला काय म्हणावे? तुम्ही सारी माणसे माझ्या सुखाचे वाटेकरी आहात, दुःखाचे कोणी वाटेकरी होत नाही. म्हणूनच मी पांडुरंगाचे पाय धरून सर्वस्वी त्याचा झालो. तो माझे विश्रांतिस्थान आहे. त्याचे गुणगान करण्यात मला आनंद वाटतो. आई, मी तुला माझ्या अगदी मनातील गोष्ट सांगतो-

काया वाचा मनें ममत्व माझ्या ठायीं / तें तूं ठेवी पायीं विठोबाचे //
माझ्यावर जे तू एवढे कायावाचामनाने प्रेम करतेस, तेच प्रेम श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी कर, म्हणजे तो तुला केव्हाही अंतर देणार नाही.”गोणाईला अर्थातच हा उपदेश खपला नाही. शेवटी रागाच्या भरात नामदेवाची व विठ्ठलाची मनसोक्त्त निर्भर्त्सना करून ती म्हणाली, “नामदेवा”,-

तुज नेल्यावांचून नथ जाय येथून / पंढरी गिळीन विठोबा सहित //
आपल्या उपास्यदेवतेची यापेक्षा अधिक निंदा नको, असा विचार करून नामदेव आईबरोबर घरी निघुन गेले. गोणाई-नामदेवांचा हा संवाद करुनरसपूर्ण आहे. वैतागाच्या भरात गोणाई कधी मर्यादा सोडून बोलते, कधी देवाला बोल लावते,`माझे बाळ कां केले वेडे’ व`तुझे काय खादले’ असे म्हणून त्याच्याशी भांडते. देवाने संसार बुडविला म्हणून त्याच्यावर चिडते, तरी तिच्या साध्याभोळ्या करुण वाणीत आईची माया आहे, पुत्राविषयीची कळकळ आहे व विठ्ठलावरील विरोध-भावनेतून व्यक्त्त होणारे प्रेम आहे-

मी एक आहे तंव करीन तळमळ / मग तुझा सांभाळ कोण करी? //
जरी जालासि शहाणा तरी माझें लेंकरुं / माझा वेव्हारु विठ्ठलासी //

नामदेवांचा नित्यक्रम चालूनच होता. तो सुटावा म्हणून गोणाईप्रमाणेच दामाशेटी आणि राजाई यांनीही त्याची पाठ पुरविली. त्यांच्या वडिलांना हा नित्याचा विठ्ठलछंद पसंत नव्हता. ते नामदेवांना म्हणत-

“नामदेवा, शिवण्याटिपण्याचा व्यवसाय करून प्रपंच चालविणे हा आपला कुलधर्म. गणगोतात तू चांगलाच लौकिक कमावलास, अरे तुला ही कसली भूल पडली? विठ्ठलाच्या ठिकणी तुला एवढे कसले सुख लाभले? तुझा देव पाहावा तर धडफुडा आणि तूं त्याचा निधडा भक्त्त. 

खरोखरी एकमेकांना तुम्ही चांगले शोभता, तुझ्याविषयी केवढ्या आशा मी ऊराशी बाळगल्या होत्या ! माझे आयुष्य आता संपत आले आहे. थोडेच दिवस उरले आहेत. आमच्या पश्चात तू नावलौकिक राखशील असे वाटले होते, पण तू तर चांगले दैव काधलेस. खांद्यावर भोपाळा काय घेतोस? रामकृष्णाचा जप काय करतोस? अरे, नाम्या तू सर्व लोकलज्जा सोडलीस आणि कुळाला कलंक लावलास.”

दामाशेटीचे हे बोल कडक वाटतात. त्यांच्या वाणीत उपरोधाबरोबर निर्भर्त्सनाही आहे. 
नामदेवांनी संसारात लक्ष घालावे म्हणून त्यांची पत्नी राजाई हिने त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. तीही उद्वेगात म्हणे-

“तुमची आई तुम्हाला शिकविते ते तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला लौकिकाची भीती व लाज वाटत नाही. लंगोटी लावून गोसावी झालात खरे, पण आमची उठाठेव कोण करणार? तुमची ही विरक्त्त स्थिती पाहून मला काळजी पदली आहे. बळेच आपण वेड कशाला लावून घेता? कंटकमय परिस्थिती झाली खरी. गोकुळासारखा संसार, तोही उजाड केलात व जगात नावलौकिक वाढविलात. मायामोहाच्या बेड्या तोडल्या पण ही मोहिनी तुमच्या मनाला कोणी हो घातली?

सर्वस्वाचा त्याग केलात नि देव जोडला. त्यानेच माझ्या संसाराचा नाश केला. तुम्हाला माझी दया कायेत नाही? माझी सासू तर भोळीभाबडी. त्यांनी पांढय्रा स्फटिकासारख्या माझ्या पतिरायाला जन्म दिला. त्यांनी भगवंताला वश केले. आता मी काय करू?” राजाईला शेवटी आपल्या पतीची आध्यात्मिक योग्यता व सामर्थ्य पटले.

पश्चात्तापाने ती म्हणते-

मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा / अपराध क्षमा करा माझा //
अंतरींची खूण कांहीं सांगा मज / जें तुम्ही बीज हदयी धरूनि असां //
जेणें सुखें तुमचें चित्त निरंतर / आनंदें निर्भर सदा असे //

नामदेवांच्या चरित्रात असे सरस व भक्त्तिरसाने भरलेले अनेक प्रसंग आहेत. आपली जीवनविषयक भूमिका नामदेवांनी आत्मचरित्रात विस्ताराने सांगितली आहे. त्यात पारमार्थिक साधने करीत असता काय काय अडचणी आल्या, कौटुंबिक अडथळे कसे सहन करावे लागले, इत्यादींचे सुंदर निरूपण नामदेव व त्यांची आई गोणाई यांचा संवाद, ते व त्यांचे वडील दामाशेटी, नामदेव व त्यांच्या पत्नी राजाई यांचा संवाद यात तटस्थ वृत्तीने केले आहे.

आरंभी नामदेवांच्या विठ्ठलभक्त्तीला विरोध करणारे हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रभावाने विठ्ठलाच्या भक्त्तिप्रेमात पुढे रंगून गेले, विलीन झाले हे नामदेवांनी स्वीकारलेल्या भाक्त्तिमार्गाचे फार मोठे यश आहे. नामदेवांनी ही आत्मकथा अतिशय आत्मीयतेने आणि तळमळीच्या उत्कट भाषेत सांगितली आहे. प्रापंचिक साधकांना या आत्मकथेचा फार उपयोग होतो व नामदेवांच्या गृहजीवनाचीही त्यावरून चांगली ओळख होत.

नामदेव – ज्ञानेश्वर भेट व गुरूपदेश

नामदेवांच्या जीवनात अत्यंत मह्त्ताची घटना म्हणजे नामदेव व ज्ञानदेव यांच्या प्रथम भेटीचा प्रसंग. या भेटीच्या काळाचा अंदाज ज्ञानदेवांच्या परंपरेतील चवथे उद्‍अबोधनाथ यांनी लिहिलेल्या ज्ञानदेव चरित्रातील भिंत चालविल्याच्या प्रसंगाच्या कालनिर्देशावरून करता येतो –

भानू शत भानू रची ज्ञानेश्वरी / विकृत संवत्सरीं ज्ञानरूप //
त्याच शकीं रिपु म्हैसा बोलविला / चालवि भिंतीला वसू माजी //

यावरून शके १२१२ च्या कार्तिक महिन्यात निर्जीव भिंतीस चालवून तापीतीर निवासी सिद्ध चांगदेवास सामोरे जाण्याची आज्ञा ज्ञानदेवांनी त्या भिंतीस केली. त्यानंतर चांगा वटेश्वरांनी ज्ञानदेवांच्या प्रेरणेने मुक्त्ताईचा अनुग्रह घेतला. या अनुग्रहानंतर नामदेव-ज्ञानदेवांची भेट झाली, असे निवृत्तिनाथादी संत व मुक्त्ताबाई यांच्यात झालेल्या संवादावरून म्हणता येते. नामदेवांचा जन्म शके ११९२, म्हणजे या भेटीच्या वेळी त्यांचे वय २० वर्षाचे होते. हे भेट शके १२१२ च्या कर्तिक महिन्यानंतर आळंदी येथे झाली असावी. 

लहान वयातच आवंढ्या नागनाथाच्या देवळात नामदेवांना `ससार’ झाला होता. “……..प्रेमें केला वेडा पांडुरंग” अशी त्यांची स्थिती होती. हळुवार मनाच्या त्या अवस्थेत पांडुरंगाची सगुण मूर्ती हेच परब्रह्म. त्याच्या व्यतिरिक्त्तदेव नाही, अशी सगुण मूर्तीच्या स्वरूपाचा ध्यास घेऊन तळमळत राहणाय्रा नामदेवांची ठाम समजूत होती. या एकविध अंधश्रद्धेला धक्का देण्याच्या उद्देशानेच, 

“नामदेवा देवे सांगितलें कानीं / संतांचे दरुशनी जावे तुवां // ”

अशी देवाकडून प्रेरणा मिळाली व ते निवृत्तिनाथादी भावंडांच्या दर्शनाला आळंदीस आले. “पंढरीचा प्रेमा घरा आला”म्हणून निवृत्तिनाथ नामदेवांच्या चरणी लागले. आपणच विठ्ठलाचे गाधे भक्त्त असा अहंकार नामदेवांच्या चित्तात दडला होता. तो यावेळी बाहेर पडला. ते म्हणाले, “ आम्ही देवाच्या सान्निध्यात सतत आहोत. मग यांच्या चरणवंदनाची आम्हांस आवश्यकता काय?” यानंतर ज्ञानदेवांनी त्यांना नमस्कार केला.

 यांच्यापेक्षा वयाने वडील असल्याने यांना आम्ही वंद्य ” , असे म्हणून नामदेव स्तब्ध राहिले. सोपानदेवांनी नामदेवांना प्रत्यक्ष पांडुरंगाच्या ठिकाणी मानून श्रद्धापूर्वक नमन केले. त्यांनाही नामदेवांनी प्रतिनमस्कार केला नाही. या गोष्टीतील मर्म मुक्त्ताबाईच्या मनोमन ध्यानात आले. ती मूळचीच सडेतोड. नामदेवांना वंदन करण्याचे तिने साफ नाकारले. उलट तिने प्रश्न केला-

अखंड जयाला देवाचा शेजार / काय अहंकार गेला नाहीं // 
मान अभिमान वाढविसी हेवा / दिस असतां दिवा हातीं घेसी /
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ / आंधळ्या डोहळे कां बा जाले //
कल्पतरु तळवटीं इच्छिल्या त्या गोष्टी / अद्यापि नरोटी राहिली कां //

पण निवृत्तिनाथांनी मुक्त्ताबाईला दटावले, `ऐसे न म्हणावे बाई’ ; परंतु तिची कुजबूज चालूच होती. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे लागली म्हणून का त्यांच्यात गोडी येणार ? विठ्ठलाच्या सहवासात असला म्हणून का नामदेवाचा कोरेपणा जाणार आहे.? चंदनाचे झाड खर, पण अहंकाररूपी सापाने ते वेधलेले आहे.

 भक्त्तीचा बोलबाला केला नि अहंकार खुंट वाढविला. गुरुशिवाय कोरडाच. या सज्जनांनी त्याला चांगदेवासारखे भाजून पक्के करावे. कुंभार आव्यात मडकी भाजतो, त्याप्रमाणे याला भाजून काढा आणि पावन करून आपले ब्रीद खरे करा. गोरोबा काकांना बोलवा. संतपणात हा पक्काझाला का कोरा आहे, यासंबंधी त्यांच्याकडून परीक्षा करून निर्णय घ्या नामदेवासारखा भक्त्तराज आपल्या संप्रदायात नाही म्हणून निवृत्तिनाथांचाही जीव कासावीस होत होता.

“ऐसे गुंफेमध्ये नाहीं नामदेव / म्हणूनी माझा जीव थोडा होतो //” 

भक्त्तिसामर्थ्याने देवाला वश करणारा हा भक्त्त आपल्या संप्रदायात यावा हीच तळमळ निवृत्तिनाथांच्या शब्दांत व्यक्त्त झाली आहे.

यानंतर योगिती मुक्त्ताबाई योगसामर्थ्याने गोरोबाच्या भेटीस गेल्या. ही भेट कशी झाली याचे वर्णन ज्ञानदेवांनी नाथसांप्रदायाच्या सांकेतिक भाषेत केले आहे. 

मुक्त्ताईने सोहंध्वनी करताच आकाशात मोत्याचा चुरा फेकावा आणि विजेचा प्रकाश दिसावा तसे झाले. जरतारी पीतांबरांनी आकाश झाकून टाकवे त्याप्रमाणे खालपासून वरपर्यत नीलबिंदु सागर, त्यावर नाचणारी सर्पाची पिले दिसू लागली. सर्वत्र शून्याकार झाले. कडाडून वीज चमकावी आणि आपल्याच ठिकाणी गुप्त व्हावी त्याप्रमाणे गोरोबास मुक्त्ताई भेटल्या.

या भेटीतून नामदेवांच्या भतीमधील अपुरेपणाचा निर्ण्य झाला आणि गुरूपदेशाचे महत्त्व प्रस्थापित झाले. गुरूपदेश घेतल्यानेच आपल्या ऊत्कट भक्त्तीला परिपूर्णता येईल असे यातून नामदेवांना समजून चुकले. विठ्ठलाच्या साक्षात्काराने त्यालाच अनुमती मिळाली. 

गोपाळकाल्याच्या एक प्रसंगी निवृत्तिनाथ पंढरीस आले होते. तेव्हा नामदेव अंतर्मुख होऊन ईश्वरी प्रेमात तल्लीन झालेले त्यांनी पाहिले. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपान यांना मिळालेल्या ब्रह्मबीजाची प्राप्ती खेचरनाथांकडून घेण्यास 
नामदेवांना विठ्ठलाने प्रेरणा दिली असे निवृत्तिनाथ म्हणतात-

नुघडितां दृष्टि नबोले तो वाचा / हरिरूपी साचा तल्लीनता //
उठि उठि ते नाम्या चाल रे सांगातें / माझे आवडते जिवलगे //
कुरवाळिला करें पुसतसे गुज / घेई ब्रह्मबीज सदोदित //
ज्ञानासि लाघले निवृत्ति भावले / सोपाना घडले दिनरात //
तें हें रे सखया खेचरासि पुसे / गुरुनामीं विश्वासें ब्रह्मरुपें //
निवृत्ति म्हणे आता अनाथा श्रीहरी / तूंचि चराचरी हेचि खूण //

संत नामदेव भारतयात्रा

`ज्ञानदीप लावूं जगीं’ या काव्यपंक्त्तीत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ईश्वरभक्त्तीच्या ज्ञानज्योतीवर असंख्य दीप उजळून मानवी उज्वल करण्याचे त्यांचे जीवनध्येय होते. ज्या शब्दांनी जनताजनादर्न डोलू लागेल, सर्वत्र प्रेमभाव वाढेल आणि आत्माज्ञानाचा दीप प्रज्वलित होईन असे साहित्य निर्माण करू अशी प्रेरणा, `बोलूं ऐसे बोल’ या अभंगचरणात त्यांनी व्यक्त्त केली आहे. जनतेचा आध्यात्मिकदृष्ट्या विकास व्हावा हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे ते स्वतःव त्यांची भाषा प्रांतिक मर्यादेत अलिप्तपणे गुरफटलेली नाही. 

भक्त्तिप्रचारासाठी त्यांनी त्या काळातील लोक-सरस्वतीत, म्हणजे हिंदी भाषेत रचना केली आणि आयुष्यभर भारतयात्रा चालू ठेवली. ते इतर प्रांतीय भाषा शिकले. महाराष्ट्रातून निघाल्यावर ते थेट दक्षिणेस म्हैसूर (कर्नाटकासह), तामिळनाड, रामेश्वरपर्यत गेले व उत्तरेकडे गुजरात, सौराष्ट्र, सिंधुप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब हरियाना, हिमाचल प्रदेश व पुन: पंजाबात भक्त्तिप्रचार करीत गेले. पंजाबी भाषेत त्यांनी पद्ये लिहिली. प्रांताप्रांतातील भाषा आत्मसात केल्या आणि त्यांचा उपयोग लोकजागृतीसाठी केला

दुसरी पदयात्रा त्यांनी दक्षिण भारतात केल्याची माहिती नवीन मिळालेल्या तीर्थावळीतील तीर्थयात्रेतील गावांच्या नावांवरून मिळते. श्रीशैलशिखर, मल्लिकार्जुन, अरुणाचल, चिदंबर, विष्णुकांची, रामेश्वर, ताम्रपणिका, आळुवा, कन्याकुमारी, हरिहरेश्वर जनार्दन या तीर्थांच्या ठिकाणी शके १२१८ च्या सुमारास जाऊन नामदेवांनी भागवतधर्माचा, मानवधर्माचा प्रचार केला. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांतून विखुरलेल्या दर्जी, छिप्पिगा या अल्पसंख्य लोकांवर त्याचा प्रभाव पडला. तेव्हापासून ती अल्पसंख्य ज्ञाती आपणांस `नामदेव’ म्हणवू लागली व मद्रास (तामिळ्नाडू) राज्यातील भूसागर व मल्ला या ज्ञाती ` नामदेव ‘ हेही आपल्या ज्ञातीचे समानार्थक नाव मानू लागले. 

यानंतर संपुर्ण भारतवर्षाची प्रदीर्घ यात्रा नामदेवांनी पायी केल्याची माहिती नवीन उपलब्ध झालेली आहे. ही यात्रा शके १२२० ते १२२६ यासहा वर्षांतील दिसते. वै. प्र. सी. सुबंध यांना पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात, शके १५०३ मध्ये लिहिलेले एक जुने हस्तलिखित मिळाले. हे तीर्थयात्रेचे टांचण चौदा अभंगांत आहे. त्यात नामदेवांनी सर्व भारताची जी पदयात्रा केली त्याचे वर्ण्न संक्षेपाने केलेले आहे. ही तीर्थयात्रा नामदेवांनी एकाच वेळी व एकटयानेच केली असल्याचेही दिसून येते. कारण इतर संत त्यांच्याबरोबर असल्याचा कोठेही उल्लेख नाही. या प्रदीर्घ यात्रेत नामदेव काही तीर्थक्षेत्रांत अनेक महिने रहात असत. 

“षण्मास राहिल्या द्वारकेचे पुण्य / एके दिवशी संकोद्वारी तेथे जाऊनि पाहिला देव //”

या अभंगचरणावरून द्वारकेला नामदेवांचा मुक्काम सहा महिने होता व या मुक्कामात ते संकोद्वाराला गेले होते हे कळते. या पदयात्रेची सुरुवात पश्चिमेकडून झाली. नंतर पश्चिमेकडून उत्तरेकडे व उत्तरेकडे पूर्वेकडील तीर्थक्षेत्रे पहात पहात पुन्हा ते पंढरपुरास आले. ती पदयात्रा पुढील क्रमाने पूर्ण झाली.

या तीर्थक्षेत्रांची नावे-नीरा -भीवर संगम , गोदावरी नाशिक-पंचवटी, घृष्णेश्वर, ओंकारमांधाता, द्वारका, रैवतक, ढवळपूर, मुचकुंदगुंफा, प्रभास, सोरटीसोमनाथ, सिद्धपूर, पुष्कर, कुरुक्षेत्र, ठाणेश्वर, यमुनातीर, इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर अंतर्वेदी, मायापूर, हरिद्वार, ह्रषीकेश, देवप्रयाग, केदार, कैलास, बद्रिनारायण, मानससरोवर, गंडकी, अयोध्या, नैमिष्यारण्य, मधुपुरी, गोकुळवृंदावन, कालियाडोह, गौतमेश्वर, मिथिला (जनकनगरी), उज्जयिनी, प्रयाग, काशी, विश्वेश्वर, गया, गंगा-सागर संगम, महाबळेश्वर व पुन्हा परत पंढरपूर अशी ही सहा वर्षांची पदयात्रा होय. 

या चवथ्या पदयात्रेत नामदेवांनी कीर्तनभजनाच्याद्वारे विठ्ठलनामाचा आणि ईश्वरभक्त्तीचा एवढा प्रचार केला की त्याचा प्रभाव मध्य भारत व उत्तर भारत येथील साहित्यावर झाल्याशिवाय राहिला नाही नदी कोरडी पडली तरी तिच्या पात्रात थोडेसे उकरताच जसा पाण्याचा प्रवाह झुळझुळताना दिसतो त्याप्रमाणे नामदेवांच्या भक्त्तिप्रवाहाचे परिणाम त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या मध्य भारत व उत्तर भारतातील साहित्यात आढळून येतात. 

पुढे नामदेवांनी राजस्थानकडे संचार केला. ठिकठिकाणच्या मुक्कामांत त्यांनी भजनकीर्तनाचा पाऊस पाडला. त्यामुळे राजस्थानच्या जीवनावर अनंत काळ संस्कार करणारे परिणाम झाले.

राजस्थानमधील जयपूर येथील ३ नामदेव मंदिरे, जोधपूर, अलवर येथील मंदिरे, बिकानेरजवळ कोलायतजी येथील नामदेवरायांची विहीर, पुष्कराज येथील २ मंदिरे, बगरू, संगनिर, काळाडेरा इत्यादी ठिकाणी जुन्या नव्या स्वरूपात उभी असलेली १५० चे वर नामदेवांची लहान मोठी सार्वजनिक मंदिरे ही त्यांच्या राजस्थानमधील प्रचारकार्याची आजही साक्ष देतात. 

समाजिकदृष्ट्या नामदेवांच्या पदयात्रेचा दुसरा असा एक परिणाम झाला की या भागातील शिंपी तेव्हापासून स्वतःस `नामावंशी छिपा दर्जी ‘ असे म्हणू लागले या जातीची संख्या राजस्थानात हल्ली मोठया प्रमाणात आहे. 
राजस्थानातील प्रसिद्ध कवयित्री मीराबाई ( इ.स. १४९८ ते १५४६) यांनी पूर्ववर्ती कवींचा उल्लेख करताना 

नामदेवांचाही भावपूर्ण शब्दांत निर्देश केला आहेः–
 

म्हारे नैंणा आगे रहाजो जी, स्याम गोविंद //टेक//
दास कबीर घर बालद जो लाया, नामदेव की छान छबन्द /

दास घना को खेत निपजायो, गज की टेर सुनन्द /
सब सन्तो का काज सुधारा, मीरा सूं दूर रहन्द //

(हे श्यामवर्ण गोविंद, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही रहा….आपण कबीराच्या घरी बैल आणला, नामदेवाचे छप्पर शाकारून दिले. घन्नादासाच्या शेतात बी पेरलेत आणि गजेन्द्राचा धावा ऐकून त्याच्या सहाय्यार्थ धावून गेलात. सर्व संतांची कामे केलीत परंतु मीराबाईपासून तुम्ही दूर का रहाता? 

राजस्थानानंतर, नामदेव वैष्णवांच्या मांदियाळीसह भक्त्तिमार्गाचा प्रचार करीत प्रयाग वाराणसी, गया इत्यादी स्थळी गेले. त्यावेळी उत्तरेस मुसलमानी सत्तेचे एकछत्र राज्य होते. परिणामी, भारतीय समाज हतबल झाला होता. दुभंगून गेला होता.हिंदी भाषिकांच्या या प्रदेशांत नामदेवांनी कीर्तन संस्थेच्या प्राचीन व्यासपीठावरून एकेश्वरवादाचा, विशुद्ध भक्त्तीचा, जातिवर्णनिरपेक्ष मानवधर्माचा आणि सदाचारपूर्ण जीवनाचा आदेश, त्या कालातील लोकभाषेत म्हणजे हिंदीभाषेत दिला. त्यांनी हिंदु-मुसलमानांच्या भावनात्मक एकतेसाठी आवाहन केले.

मानवी समतेचा पुरस्कार केला. नामदेवांची कित्येक पदे निर्गुणवादपरिपूर्ण आहेत. हिंदु-मुसलमानांच्या अंध धर्मश्रद्धेचा त्यात उपहासच आहे. या दोन्ही धर्मांतील रूढींचा व बोजड 

शके १२६० वद्य पंचमीस नामदेवांचे शिष्य चोखामेळा हे मंगळवेढे येथे कुसाचे काम करीत असताना त्यांनी इहलोक सोडला. नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी गोळा केल्या आणि त्या पंढरपुरास आणून त्यांनी देवाच्या महद्वारासमोरच या आपल्या यातिहीन शिष्योत्तमाचे कायमचे स्मारक केले. मानवाच्या विकासात अडथळा निर्माण करणारी अस्पृश्यता ही आजच्याप्रमाणेच त्या काळीही एक बिकट समस्या होती. नामदेवांनी यातिहीनांचीही सेवा करून अस्पृश्योद्धारावरील श्रद्धा व महत्त्व जगास पटवून दिले. माणसा-माणसांतील विषमता दूर करण्याचे त्यांनी सर्वप्रथम जे प्रयत्न केले. त्यांपैकी हा एक प्रमुख प्रयत्न होय.

शके १२६१ च्या सुमारास पुन्हा नामदेवांच्या पायांची चक्रे गातिमान झाली वते उत्तरेकडे गेले असे बाबा पूरणदासकृत `जनमसाखी’ व इतर पंजाबी साहित्यावरून स्पष्ट होते. त्यात दिलेल्या हकीकतीवरून, नामदेव हे त्यावेळी एकटेच तीर्थयात्रा करीत द्वारकेस गेले. द्वारकेहून ते मारवाड येथे व तेथून मथुरेकडे गेले. पुढे हरिद्वारास जाऊन तेथून ते पंजाबकडे गेले. पंजाबातील गुरुदासपूर जिल्हा हा त्यांची कित्येक वर्षे कर्मभूमीच बनली. प्रथम, ते हरिद्वाराजवळ वसलेल्या शहरानपूर जिल्ह्यातील ज्वालापूर येथे गेले.

या ठिकाणी एक मठ नामदेवांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. पंजाबमध्ये अमृतसर तहसिलात, भूतविंड म्हणून एक गाव आहे. तेथे ते आले. तेथून वैष्णव धर्माचा प्रचार करू लागले. ते हा प्रचार करीत असता, त्यांची फारच कीर्ती झाली. भूतविंड गावी अडोली नावाची एक विधवा स्त्री रहात होती. ती मोलमजुरी करून, आपला एकुलता एक मुलगा बाला याचे लालनपालन करीत होती.

तो पोटदुखीच्या व्यथेने आजारी असता, त्याला नामदेवांनी मरता मरता वाचवले व त्याच्यावर अनुग्रह केला. तेव्हापासून तो नामदेवांच्या सेवेत राहू लागला आणि `बोहरदास’ हे नाव त्याने धारण केले. हाच पुढे नामदेवांचा पट्टशिष्य बोहरदास म्हणून प्रसिद्धीस आला. नामदेवांच्या घुमान येथील देवालयाची व्यवस्था अद्यापि बहोरदासांच्याच वंशजाकडे आहे.


संत नामदेव कार्य

बर्‍याच भक्तीग्रंथांमधे त्यांच्या कीर्तनांचा संदर्भ आहे. ह्या वरून ते चांगले शिकलेले व मोठे विद्वान होते ास म्हणू शकतो. त्यांचे कीर्तन फार प्रभावी होते, ते म्हणायचे –

नामदेव(sant namdev) कीर्तन करी, पुढे नाचे देव पांडुरंग
(नामदेव कीर्तन करत असताना, त्यांच्या समोर देव पांडुरंग नाचत असे)

नामदेवाच्या(sant namdev) जीवनात एक घटना घडली. एक दिवशी नामदेव बाजारात काही कापडं विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले, व आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्या करिता आलो होतो व आता ते विकले गेले नाही म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापडं ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडा वरच सोडून दिले, व दूसर्‍या एक दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दूसर्‍या दिवशी त्यांना पैसे देईल, आणि ते मंदिरात जाऊन बसले. 

नामदेवांचे(sant namdev) वडिल त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला (अर्थात् त्या दगडाला, महाराष्ट्राच्या काही लोकांमधे धोंड्या हे नाव पण असतं) आणायला सांगितले ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दूसर्‍या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्वे कापडं तेथून नाहीसे झाले होते, दूसर्‍या दगडाला (धोंड्या) त्यांनी घरी आणलं, जसे काही त्याने पैसे द्यायला नकारा दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले.

त्या नंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली व आपली अडचण पण सांगितली. नामदेवांच्या(sant namdev) वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हामी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले, नामदेवांनी(sant namdev) उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केलं आहे व स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्या करिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अतिआनंद झाला; पण नामदेवांना याचा लेशमात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचा फक्त या गोष्टी साठी आभार मानला की त्यांना देवानी मार खाण्यापासून वाचवलं.

नामदेव(sant namdev) वीस वर्षाचे होते तेव्हां त्यांची भेट महान संत ज्ञानेश्वरांशी पंढरपुरला झाली. ज्ञानदेव सहजपणे विठोबाच्या या महान भक्ताला भेटून खूब आनंदित झाले. त्यांनी नामदेवांना आपल्यासोबत विविध भक्तीस्थानांची यात्रा करण्यास घेतले. नामदेवाच्या जीवनाचा हा खूप महत्वपूर्ण काल होता. या काळापासून व्यावहारिक दृष्ट्या, दोन महान संत मृत्युपर्यंत बरोबर राहिले. त्यांची तीर्थयात्रा भारताच्या सगळ्या भागांपर्यंत व जवळजवळ सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचली.

रस्त्यात, नामदेव(sant namdev) व ज्ञानदेवांनी कित्येक चमत्कार दाखविल्याचा उल्लेख आहे. जसे की – नामदेव(sant namdev) आणि ज्ञानदेव नागनाथपुरीला आले. नामदेवांनी मंदिरात भजनाला सुरुवात केली. तेथे विशाळ गर्दी जमली. मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते म्हणून त्यांचा संताप झाला. नामदेव(sant namdev) त्या मंदिराच्या पश्चिमद्वारेवर जाऊन बसले व रात्रभर भजनकीर्तन केले. चमत्कार असा झाला की मंदिरातील प्रतिमा आपल्याआप त्यांच्या कडे वळून गेली. 

अशीच एक घटना कर्णाटकाच्या उडुपी मंदिराची पण आहे. तिथलचे देव श्री कृष्ण, यांच तोंड इतर मंदिराच्या मुर्तीसारखे नसून, पश्चिमेकडे आहे. उडुपीचे तीर्थयात्री संत कनकदासाविषयी एक कहाणी प्रसिद्ध आहे. ते खालच्या जातीचे असून, परंपरेनुसार त्यांना मंदिरात प्रवेशण्यास नकार करण्यात आला व दर्शन घेऊ दिले नाहीत.

कृष्ण कनकदासाच्या भक्तीने आनंदित झाले व त्यांची प्रतिमा मंदिराच्या पश्चिमीभागी वळून गेली कारण कनकदास मंदिराच्या पृष्ठभागी भजन गात होते. मागून पश्चिम भागाच्या भींतीशी एक लहानशी खिडकी बनवण्यात आली जेथून कनकदास कृष्णाचे दर्शन बाहेरूनच, या खिडकीतून (नवग्रह कितिकी) करु शकतो, ज्यावर कलात्मक कोरीव काम केलेल्या चांदीच्या पतर्‍याचे आवरण आहे. कृष्णाच्या प्रतिमेजवळ एक दिवा जळत असतो, हा दिवा श्री माधवचार्यांनी लावला होता व तेव्हांपासून आजपर्यंत तो तेवत आहे.

नामदेवांनी(sant namdev) कोणत्याही मोठ्या ग्रंथाची रचना केली नाही; पण त्यांनी देवाची भक्ती व प्रेमाने परिपूर्ण असे अनेक अभंग व लघुकाव्यांची रचना केली. त्या अभंगात एक अपूर्व गोडवा आहे. ह्यातले मोठ्या प्रमाणात तर हरवले, पण तरीही सुमारे चार हजार अभंग अजून ही आहे, जे आजही त्याला वाचणार्‍यासांठी प्रेरणास्रोत आहे. काही अभंगांचा समावेश सिख आदि ग्रंथात पण झालेला आहे.

नामदेवांनी(sant namdev) दिलेल्या संदेशात मूलतत्व हे आहे: “देवाच्या नावाचा नित्य जप करा. त्याच्या कीर्तीचे श्रवण करा. हृदयातील देवाचे ध्यान-आराधना करा. देवाची सेवा करा. त्याच्या कमलाचरणी डोकं ठेवा. कीर्तन करा. तुमची भूक तहान सर्व तुम्ही विसरून जाल. देव तुमच्या अगदी जवळच असेल. तुम्हाला अमरत्व आणि शाश्वत परमानंदाची अनुभूति होईल”.

ते पंजाब मधे वीस वर्ष राहिले व त्यांनी तेथे अभंगांची रचना केली जी सिख आदि ग्रंथांमधे देखील आहे. या जगात जगण्याची इच्छा नसून त्यांनी सव्हिसाव्या वर्षी पूर्ण कुटुंबासोबत पंढरपुरला समाधि घेतली. त्यांची समाधि ‘नामदेव पायरी’ म्हणून ओळखली जाते.  

आकल्‍प आयुष्‍य व्‍हावे तया कुळा । माझिया सकल हरिचिया दासा ॥ 
कल्‍पनेची बाधा न हो कोणे काळी । ही संत मंडळी सुखी असो॥

संत नामदेवांचे चरित्र
Scroll to top